खरिपाचे उद्दीष्ट बँकांनी 31 जुलैपर्यंत पूर्ण करावे - पालकमंत्री प्रकाश सोळंके परभणी, दि. 14 : खरीप हंगाम हा शेतक-यांसाठी महत्त्वाचा आहे. पीक कर्जाबाबत शेतक-यांच्या अनेक तक्रारी येत आहे. बँकांनी शेतक-यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणे गरजेचे असून जिल्ह्यातील बँकांनी खरिपाचे उद्दीष्ट 31 जुलैपर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना पालकमंत्री प्रकाश सोळंके यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम पीक कर्ज आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गोटे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कुडमूलवार, उपविभागीय अधिकारी प्रवीण धरमकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समशेर वरपूडकर, विजय भांबळे आदी उपस्थित होते. बँकेबाबत शेतक-यांच्या तक्रारी येऊ देऊ नका. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्याचा खरीप क्रेडीट प्लान कमी आहे. तो वाढविण्यासाठी नियोजन करून जिल्हाधिका-यांनी याचा पाठपुरावा करावा.